राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभरात आणि जगभरात असंख्य कार्यक्रम होत असताना त्या संघटने विषयी विविध पातळ्यांवर प्रचंड मंथन सुरू आहे हे संघाचे शताब्दी वर्षातले सगळ्यात मोठे यश मानले पाहिजे. संघ 25 वर्षांचा झाला, 50 वर्षांचा झाला, 75 वर्षांचा झाला त्या टप्प्यांवर संघाविषयी जेवढे मंथन झाले नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रचंड प्रमाणात मंथन संघाच्या शताब्दी वर्षात होते आहे. संघाविषयीची देशभरातच नव्हे, तर जगभरातली उत्सुकता वाढत आहे आणि त्याचबरोबर संघाचा वैचारिक पासून ते संघटनेपर्यंत सर्वत्र विस्तार होत आहे, हे संघाचे आणखी मोठे यश मानले पाहिजे. RSS centenary
– शाखा आणि संस्कारांची मर्यादा
नागपुरात मोहिते बागेतल्या शाखेवरून सुरू झालेला संघ प्रचंड सेवा कार्य उभारण्यापर्यंत आला. 1990 च्या दशकानंतर त्याने सत्तेकडे झेप घेतली. तोपर्यंत संघ राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या “अस्पृश्य” मानला गेला होता. कारण त्यावेळी संपूर्ण देशावर काँग्रेसी, समाजवादी आणि कम्युनिस्टांचे सर्व पातळ्यांवर वर्चस्व होते. ते भेदणे संघाच्या मर्यादित ताकदीला शक्य नव्हते. त्यावेळी संघ अतिशय कुर्मगतीने सर्व प्रकारची वाटचाल करीत राहिला. “शाखा” आणि “संस्कार” या भाषेत मर्यादित ठेवला गेला. त्या पलीकडे संघाचा स्वयंसेवक कुठे पाहील याची अन्य कुणालाही शक्यता वाटत नव्हती. ज्यावेळी संघाचा विस्तार अतिशय मर्यादित होता, तेव्हा संघाच्या वैचारिकतेची काँग्रेसी, समाजवादी आणि कम्युनिस्टांना एवढी भीती वाटायची की संघाला चिरडल्याशिवाय देशाचा विकास नाही आणि समाजाची धारणा नाही असे narrative त्यांनी त्यांच्या दृष्टीने पसरविले होते.
देशात कुठलीही काहीही नकारात्मक घटना घडली, तर त्याला संघ जबाबदार ठरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला होता. संघ सुद्धा प्रसिद्धी पासून दूर राहण्याचे एवढे मोठे सोवळे नेसला होता, की आपल्या विरुद्ध होणारा खोटा प्रचार आणि प्रसार हाणून पाडणे ही आपलीच जबाबदारी आहे, ती इतरांची कुणाचीही जबाबदारी नाही, हे सत्य स्वीकारायला सुद्धा अनेक वरिष्ठ स्वयंसेवक मनापासून तयार नव्हते. यात उगाच कुणाचा नामोल्लेख करून अधीक्षेप करायचे कारण नाही, पण त्यावेळच्या वरिष्ठ स्वयंसेवकांची तशी धारणा आणि मनोभूमिकाच बनविली गेली होती हे सत्य सुद्धा नाकारण्यात मतलब नाही.
देशातले राजकीय आणि सामाजिक सत्य संघाच्या विशिष्ट धारणेपेक्षा वेगळे आहे, ते स्वीकारून संघाने बदलले पाहिजे हे 1970 च्या दशकात संघातल्याच वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यात बदल घडवायला सुरुवात झाली. परंतु त्या गोष्टीला त्या काळाच्या नुसार सुद्धा बराच उशीर सुद्धा झाला होता.
– प्रसिद्धीपासून फटकून
संघाने काम तर खूप केले, पण प्रसिद्धी बिलकुल केली नाही. त्या वेळची माध्यमे संघावर सगळीकडून तुटून पडत असताना संघ माध्यमांपासून फटकून राहिला. संघांने माध्यमांना प्रत्युत्तरे दिली नाहीत. दिली असली तरी ती परिणामकारक ठरली नाही. त्याचवेळी संघाने स्वतःच्या हातात असलेले माध्यम घालविले. पण त्यापलीकडे जाऊन महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर होणाऱ्या खोट्या आरोपांना उत्तरे देणे किंबहुना स्वतःचा विशिष्ट narrative प्रस्थापित करणे ही संघाचीच जबाबदारी असताना, ती मात्र संघांनी विशिष्ट मनोभूमिकेमुळे पार पाडली नव्हती, ही वस्तुस्थिती देखील नाकारायचे कारण नाही. संघाची शाखा ही मुख्य आहे. तिचाच विस्तार करणे म्हणजे संघ कार्याचा विस्तार करणे एवढी मर्यादित भूमिका त्यावेळी सुद्धा ठेवण्याचे कारण नव्हते. राजकारण आणि समाजकारण या हिंदू समाजातल्या अपरिहार्य बाबी असताना संघाला आणि संघाच्या स्वयंसेवकाला त्यापासून दूर राखण्याचे किंवा परावृत्त करण्याचे कारण नव्हते, तरी देखील 1948 पासून ते 1970 च्या दशकापर्यंत तसे ठेवले गेले होते. हा संघाचा वास्तव इतिहास आहे.
– पुरोगामी भाषा स्वीकारण्यात अपयश
नेमक्या याच कालावधीत भारतामध्ये प्रचंड बदल घडत होते. विविध विचारसरणीच्या संकल्पना आणि भाषा बदलत होत्या. नव्या नव्या संकल्पना आणि भाषा आत्मसात करून संघाविषयी विशिष्ट खोटे समज पसरविण्यात काँग्रेसी, समाजवादी आणि कम्युनिस्ट आघाडीवर होते, पण संघाने मात्र विशिष्ट पुरोगामी भाषा स्वीकारून त्यांचा प्रतिवाद तेव्हा कधी केला नव्हता. हा इतरांच्या दोषापेक्षा त्या काळातल्या संघ नेतृत्वाचा दोष होता. संघाच्या त्या वेळच्या संस्कारात “पुरोगामी भाषा” बसत नव्हती. संघाची तेव्हा देखील सर्व कृती पुरोगामीच होती, पण पुरोगामीत्वाची भाषा मात्र संघ सोडून इतरांच्या तोंडी होती. त्यामुळे संघाविषयी fake narrative पसरविण्यात संघविरोधक त्या काळात अधिक यशस्वी झाले होते.
– संघापुढचे खरे आव्हान
संघातल्या त्यावेळच्या संस्कारांचा पगडा अजूनही म्हणजे अगदी शताब्दी वर्षात सुद्धा पूर्ण दूर झाला असे मानणे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणारे ठरेल. कारण संघ आणि संघ परिवाराची प्रचंड ताकद निर्माण झाल्यानंतर सुद्धा संघाला स्वतःचा विशिष्ट narrative देशात प्रस्थापित करता आलेला नाही. उलट एवढी मोठी संघटना, एवढे सातत्यपूर्ण काम, त्याही पलीकडे जाऊन जपलेला सेवाभाव आणि तरीही स्वतःचे narrative मपूर्णपणे प्रस्थापित करण्यात अजूनही न आलेले यश हा दोष इतरांचा नाही, तर तो “संघ संस्कारितांचा” अंगभूत दोष आहे. तो दोष दूर करणे हे खऱ्या अर्थाने शताब्दी वर्षातले आणि शताब्दी वर्षानंतरचे आव्हान आहे.
RSS centenary : fake narrative, hard facts and hard truth
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी + शरद पवारांच्या सकट लिबरल लोकांनी Gen Z पोरांवर ठेवला भरवसा; पण पोरांनी JNU मध्ये फडकवला संघाचा झेंडा!!
- Netanyahu : दोहा हल्ल्याबद्दल नेतन्याहू यांनी कतारची माफी मागितली; ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून फोन केला
- ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही, पण शेतकऱ्यांच्या दुष्काळी निकषांमधली सगळी मदत देऊ; मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द!!
- Asaduddin Owaisi : क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत करीत आहेत, हे कितपत योग्य ? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल
Post Your Comment