फक्त कामाने सगळे राजकारण स्वतःभोवती खेळवत ठेवणारा नेता!!, या शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या 75 वर्षांच्या व्यक्तीचे वर्णन करावे लागेल. मोदींकडे ना स्वतःचे कुठले मोठे नाव होते, ना राजकीय घराणे होते, त्यांच्याकडे होती आणि आहे, फक्त कामावरची निष्ठा आणि सतत कार्यमग्न राहणारी ऊर्जा. निष्ठा आणि ऊर्जा या दोन गुणांच्या बळावर मोदींनी फक्त कामाने स्वतःभोवती भारताचेच काय, पण आता सगळ्या जगाचे राजकारण खेळवत ठेवले आहे हे मान्य करावे लागेल. PM Modi
– पुरोगामीत्वाचा बुरखा नाही
त्यासाठी मोदींना कुठले वेगवेगळे उपद्वाप करावे लागले नाहीत. स्वतःच्या तोंडावर पुरोगामी बुरखा ओढून जातीजातींमध्ये फूट पाडावी लागली नाही. जातीच्या राजकारणाची पोळी भाजावी लागली नाही, की निवृत्तीच्या घोषणा करून पुन्हा खुर्चीवर बसावे लागले नाही. एकदा जे राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक तत्त्वज्ञान स्वीकारले, त्यावरच मोदी वाटचाल करीत राहिले. या वाटचालीमध्ये त्यांनी सातत्य ठेवले. या वाटचालीत त्यांना ओव्या मिळाल्या. शिव्या मिळाल्या. किंबहुना त्यांच्या वाट्याला ओव्यांपेक्षा शिव्याच जास्त आल्या. पण त्या शिव्यांनीच मोदींचे राजकीय भरण पोषण केले. शिव्या देणाऱ्या विरोधकांना अजूनही हे कळलेच नाही, की मोदींवर आपण उधळलेल्या शिव्या त्यांच्यासाठी फुलांच्या ओव्या ठरतात. त्यांचाच आधार घेऊन मोदी आपल्या राजकीय विजयाची इमारत बांधतात. त्यामुळे विरोधक मोदींना शिव्या देत राहतात आणि मोदी त्याचा राजकीय वापर करून विजय मिळवत राहतात.
– सर्वसमावेशक भूमिका
याचा अर्थ मोदी सकारात्मक काहीच करत नाहीत, असे अजिबात नाही. उलट ते त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार जास्तीत जास्त सर्वसमावेशक भूमिका घेऊन राजकारण साधत राहतात, पण ते भारतातल्या गेल्या 75 वर्षांच्या राजकारणाच्या पठडी पेक्षा वेगळे ठरत असल्याने विरोधकांनाच काय पण त्यांच्या मित्रांना देखील ते अनेकदा भावत नाही, रुचत नाही की पचत नाही. पण त्यांचे मित्र त्यांना काही बोलू शकत नाहीत आणि त्यांचे राजकीय शत्रू त्यांना शिव्या घातल्याशिवाय थांबू शकत नाहीत. पण म्हणून मोदींची वाटचाल बिलकुल थांबत नाही. म्हणूनच “मौत के सौदागर” पासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आजही “वोट चोरीच्या” आरोपाखाली जसाच्या तसाच सुरू राहिलाय. त्यामध्ये विरोधक कुठलाही अडथळा आणू शकले नाहीत.
– विरोधक थकले, रिटायरमेंटची वाट पाहू लागले
शेवटी विरोधक एवढे थकलेत की आता मोदी 75 वर्षांचे झालेत ना, मग त्यांनी स्वतःच लावलेल्या नियमानुसार त्यांनी रिटायर्ड व्हावे म्हणजे तरी आम्हाला मोदी राजवटी पासून सुटका मिळेल अशी विरोधकांची मनापासूनची भावना आहे. पण ते “मोदी” आहेत. विरोधकांनी बांधलेल्या अडाख्यानुसार ते वागले, तर त्यांचे “मोदीत्व” शिल्लक ते काय राहिले??, त्यामुळे आज 75 वर्षांचे होऊनही ते रिटायर्ड झाले नाहीत. ते टायर्ड तर कधीच झाले नाहीत. त्यांनी विरोधकांना मात्र टायर्ड करून सोडले.
– मोदींच्या यशाचे रहस्य
मोदींच्या या यशाचे रहस्य एकजुटीच्या सकारात्मकतेत आहे, हे खऱ्या अर्थाने विरोधकांना कधी समजलेच नाही. कारण पठडीपलीकडच्या राजकारणाचा विरोधकांपैकी कोणीही कधी विचारच केला नाही. आजही मोदींच्या विरोधात ते सामाजिक आणि राजकीय फूट पाडून राजकारण करू पाहत आहेत. जे राजकारण भारताने 2014 सालीच मागे टाकलेय, त्याच जातीय आणि सामाजिक फुटीच्या राजकारणाच्या चिखलात विरोधक स्वतःहून अडकलेत. हा दोष मोदींचा नाही. हा विरोधकांच्या बुद्धी कौशल्याचा आणि राजकीय आकलनाचा अभाव आहे. त्याला मोदी काही करू शकत नाहीत.
– हरण्या जिंकण्या पलीकडचे मोदी
वयाच्या 75 नंतर ही मोदी असेच सक्रिय राहतील. त्यांना हवे तेव्हा ते रिटायर्ड होतील किंवा बाजूला होतील काही नेत्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राची शीर्षके “ऑन माय टर्म्स” दिली, पण त्यांचे राजकारण कधीच स्वतःच्या टर्म्सवर विशिष्ट प्रादेशिक, बौद्धिक आणि जातीच्या पलीकडे गेले नाही. त्याउलट मोदींनी आत्मचरित्र न लिहिता किंवा त्याला “ऑन माय टर्म्स” असे शीर्षक न देता स्वतःच्या टर्म्सवर राज्य करत राहिले. राजकारण स्वतःभोवती फिरवत राहिले. 75 वर्षांच्या ऋषीचे राजकारणातले हे खरे यश आहे. ते हरण्या जिंकण्या पलीकडचे आहे. समजा खरंच उद्या मोदी एखादी निवडणूक हरले, तरी मोदींमध्ये काही फरक पडणार नाही. ते स्वतःच म्हटले त्याप्रमाणे झोळी अडकवून ते निघूनही जातील. पण मोदींचा “तसा” पराभव करण्याची विरोधकांची क्षमता नाही. म्हणूनच मोदींच्या 75 व्या वाढदिवसा रिटायरमेंट कडे डोळे लावून बसलेली जमात जशीच्या तशी ठेवून मोदी पुढे सरकत आहेत.
PM Modi truned the whole politics around him only by continuing work
महत्वाच्या बातम्या
- PM Karki : नेपाळच्या पीएम कार्की यांना जेन-झी नेत्याचा इशारा- आमचे ऐकले नाही तर जिथून आणले तिथे फेकू
- अशिया कप मध्ये भारताविरुद्ध हरल्यानंतर पाकिस्तान्यांचा राग अनावर; शाहिद आफ्रिदीच्या पसंती क्रमात राहुल गांधी सगळ्यांत वर!!
- Gold Price : सोने तब्बल 1,029 रुपयांनी वाढून 1.11 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीचाही प्रति किलो ₹1.29 लाखांचा विक्रमी उच्चांक
- Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा
Post Your Comment