विशेष प्रतिनिधी
वेंगुर्ला : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात उद्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर न केल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मा. खासदार राजू शेट्टी यांनी वेंगुर्ला येथे झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केली.
चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती , अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार , फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बदलत्या हवामानामुळे तुडतुडे , फळमाशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला असून, देवगड आणि इतर भागात मोहोर करपल्याने उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. राज्य सरकारने पंचनामे करण्याच्या पलीकडे कोणतीच कारवाई केलेली नाही.
आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी किंवा हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपयाची अनुक्रमे नुकसानभरपाई देण्यात यावी.खते , किटकनाशके , बुरशीनाशके औषध कंपन्यांनी बोगस औषधे , खते व किटकनाशके यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला असून आंबा उत्पादक शेतक-यांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे कृषी विभागामार्फत संपुर्ण चौकशी करण्यात यावी व संबंधित कंपन्यावर कारवाई करण्यात यावी.देवगड याठिकाणी अद्यावत आंबा संशोधन केंद्र उभारून AI तंत्रज्ञानाव्दारे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे.आजअखेर राज्य सरकारने त्यांना कोणतीच मदत जाहीर केली नाही यामुळे नुकसान झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. वरील मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करून ते यशस्वी करण्याचा निर्णय या शेतकरी मेळाव्यात घेण्यात आले.यावेळी देवगड तालुका बागायतदार संघाचे अध्यक्ष काका डोके , जि. प. सदस्य संजय गावडे , संजय नाईक , गणेश गायकर , किरण ठेंबले , सौ. प्रिया परब , राजेंद्र गडयान्नावर , तुषार पालकर यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Your Comment