Trending News

No trending news found.

Thursday, 18 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

v

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात […]

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना आता या संपूर्ण घडामोडीत नवे वळण आले आहे. ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, कथित बंडखोरीशी संबंधित पत्रावर दोन खासदारांनी सहीच केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाचे कथित ‘ऑपरेशन टायगर’ अडचणीत येऊ शकते.

लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटातील काही खासदारांसोबत चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला. काही खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या.

याच दरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या पत्रावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार संजय दिना पाटील यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.

दोन खासदारांमुळे बदलू शकते संपूर्ण गणित?

राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, जर सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या दाव्यामध्ये सर्व संबंधित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नसतील, तर त्याचा कायदेशीर आणि राजकीय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, बंडखोरीच्या चर्चांमध्ये नाव आल्यानंतर संजय दिना पाटील यांनी स्पष्ट शब्दांत आपण अशा चर्चांना कंटाळलो असल्याचे सांगितले. “माझ्याशी शिंदे गटाकडून कोणताही संपर्क साधलेला नाही. मी कोणत्याही चर्चेत सहभागी नाही,” असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांनीही सध्या कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडता, “२० जूननंतर सर्व काही स्पष्ट होईल,” असे सांगितले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबतचे गूढ आणखी वाढले आहे.

शिंदे गटाचा दावा कायम

दुसरीकडे शिंदे गट मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आवश्यक संख्याबळ त्यांच्या बाजूने असून, प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू असून, पुढील काही दिवसांत मोठी घोषणा होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

ठाकरे गटाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न

दरम्यान, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला सर्व नऊ खासदारांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थिती लावत पक्षासोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, खासदार फोडण्याच्या चर्चा मुद्दाम पसरवल्या जात आहेत. पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणात अनेक दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत. मात्र, कोणते पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर झाले, त्यावर नेमक्या किती खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि त्याचा कायदेशीर परिणाम काय होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, ठाकरे गटातील कथित बंड खरोखरच आकार घेणार की केवळ राजकीय दबावतंत्राचा भाग ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment