Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्याच दिशेने; मग परिणाम काय होईल??

उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्या दिशेने सुरू असल्याची चिन्हे त्यांच्याच राजकीय कृतीतून दिसून आली.

नाशिक : उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्या दिशेने सुरू असल्याची चिन्हे त्यांच्याच राजकीय कृतीतून दिसून आली. त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या राजकारणाचा परिणाम काय होईल??, असा सवाल विचारायची वेळ आली.Sunetra Pawar

सुनेत्रा वहिनींची पर्स कोण सांभाळत होते??, हा सवाल आलहिदा, पण सुनेत्रा पवारांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या चाव्या, निधीचे निर्णय, खाते व्यवहार, आर्थिक अधिकार स्वतःकडे आणि स्वतःच्या परिवाराच्या ताब्यात घेतलेत, ते पाहता सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल निश्चितपणे ममता बॅनर्जी आणि एम. के‌. स्टालिन यांच्या दिशेनेच सुरू झाल्याचे ठळकपणे समोर आले.

राष्ट्रवादी काँग्रेस वर आर्थिक वर्चस्व

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये मोठी राजकीय हालचाल करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले. त्यांचे पंख कापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे राजकीय आणि आर्थिक निर्णय आपल्या ताब्यात घेतले, पण हे करताना सुनेत्रा पवारांनी फक्त प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाच बाजूला सारले असे नाही, तर त्यांनी पार्थ पवार आणि जय पवार या आपल्या दोन मुलांचे राजकीय आणि आर्थिक महत्त्व पक्षामध्ये वाढवून ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षावर अजित पवारांच्या कुटुंबाचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे चित्र निर्माण झाले.

– मोदींचा घराणेशाहीला विरोध

नेमकी हीच ममता बॅनर्जी आणि एम. के स्टालिन यांच्या दिशेने झालेली राजकीय वाटचाल ठरली, जी नरेंद्र मोदींच्या घराणेशाही विरुद्धच्या एल्गाराविरुद्ध झाली. नरेंद्र मोदींना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष अशा प्रकारे संपूर्णपणे घराणेशाहीच्या वर्चस्वाद चालावेत, अशी अजिबात अपेक्षा नाही, किंबहुना ती त्यांच्या मूलभूत राजकीय तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहे, पण तरी देखील मोदी सध्या सुनेत्रा पवारांची ही राजकीय मनमानी सहन करत आहेत. याचा अर्थच सुनेत्रा पवारांच्या दृष्टीने राजकीय भवितव्य धोक्यात आहे.

ममता बॅनर्जी आणि एम. के स्टालिन यांनी तृणमूळ काँग्रेस आणि द्रविड म्हणून नेत्र कळघम या पक्षांवर वर्चस्व निर्माण करताना नेमकी सुनेत्रा पवारांसारखीच चाल खेळली होती. ममता बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जींचे अधिकार वाढवताना त्यावेळच्या दिनेश त्रिवेदी, सुगता रॉय आधी ज्येष्ठ नेत्यांचे पंख कापले होते. अभिषेक बॅनर्जी याला पक्षाचा सरचिटणीस नेमून पक्षाची आर्थिक सूत्रे ही त्याच्याच ताब्यात दिली होती. अभिषेक बॅनर्जी आणि त्याच्या पत्नीचे तृणमूळ काँग्रेसमध्ये आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करताना ते थेट मनी लॉन्ड्रीग पर्यंत भिडवले होते. ममता बॅनर्जींची पश्चिम बंगाल मध्ये १५ वर्षे सत्ता होती, त्यामुळे तृणमूळ काँग्रेस मधला हा राजकीय आणि आर्थिक खेळ झाकला गेला होता.

– ममता आणि स्टालिन कौटुंबिक वर्चस्ववाद

एम. के. स्टालिन यांनी सुद्धा उदयनिधी स्टालिनला द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये प्रस्थापित करताना करुणानिधींच्या जवळच्या नेत्यांना दूर लोटले होते. कनिमोळी आणि त्यांचा भावाचे राजकीय पंख कापले होते. तामिळनाडूमध्ये एम. के. स्टालिन मुख्यमंत्री असताना द्रविड मुन्नेत्र कळघम मधला अंतर्गत संघर्ष झाकला गेला होता, पण तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल मध्ये स्टालिन आणि ममता यांना पराभव पत्करावा लागला, त्यांच्या पराभवात त्यांनीच नेमलेल्या उदयनिधी स्टालिन आणि अभिषेक बॅनर्जी यांचा सिंहाचा वाटा ठरला. उदयनिधी स्टालिन आणि अभिषेक बॅनर्जी यांची मनमानी वृत्ती, त्यांची दादागिरी पक्षातल्याच नेत्यांना सहन झाली नव्हती. त्याचा सुप्त परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सुद्धा झाला. भले स्टालिन आणि ममता यांनी आपापल्या नातेवाईकांना झाकले असेल, पण म्हणून त्यांची कृष्णकृत्ये उघड्यावर यायची राहिली नाहीत आणि त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागला.

– सुनेत्रा पवारांची राजकीय चूक

सुनेत्रा पवारांच्या बाबतीत ही तर सुरुवात आहे, ती त्यांनी स्वतःच पार्थ आणि जय या दोन्ही पुत्रांना जास्त अधिकार देऊन करून दिली आहे. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारणे हा राजकीय डावपेच असला तरी तो चपखलच बसेलच असे अजिबात नाही. सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख कापले असतील, पण या दोन नेत्यांना खऱ्या अर्थाने प्रबळ राजकीय पर्याय त्या उभ्या करू शकलेल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी जय पवार आणि पार्थ पवार यांचे अधिकार वाढवून त्यांचे राजकीय महत्त्व वाढवून ठेवले, पण म्हणून पार्थ किंवा जय पवार यांचे राजकीय कर्तृत्व वाढले, असे मानता येणार नाही. पार्थ आणि जय पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसला मते मिळत नाहीत. त्या दोघांच्या नावांवर मते मिळतील की नाही, हे अजून सिद्ध व्हायचे आहे. पण त्याच्या आधीच पवार परिवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय आणि आर्थिक अधिकार एकवटणे, त्याच वेळी ज्येष्ठ नेत्यांना अपमानित करून दूर सारणे ही दुहेरी चूक सुनेत्रा पवारांनी केली आहे.

– जय पवार अपरिपक्व

जय पवार किती अपरिपक्व आहे, हे त्याच्या सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या भलामणीतून समोर आले. कुठलेही अतिमहत्त्वाचे पद नुसत्या घोषणा करून मिळत नाही. त्यासाठी राजकीय कर्तृत्व दाखवावे लागते, हे सुनेत्र पवारांनी जय पवारांना खडसावून सांगायला हवे होते. त्यांच्या घरात शरद पवारांच्या निमित्ताने तसा अनुभव आला होता. शरद पवारांनी पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून त्यांना ती पूर्ण करता आली नव्हती. नुसती घोषणा करून आणि इच्छा बाळगून असले कुठले पद मिळत नसते, हे सुनेत्रा पवारांनी जय पवारांना स्पष्ट बजावायला हवे होते, पण तसे त्यांनी बजावले नाही‌. उलट पार्थ आणि जय पवार या दोघांचेही अधिकार त्यांच्या वयाच्या आणि वकुबापेक्षा जास्त वाढवून ठेवलेत, हे राजकीयदृष्ट्या चांगले लक्षण नाही. नरेंद्र मोदींच्या भाजपच्या बरोबर काम करताना तर हे बिलकुलच अपेक्षित नाही.

– कौटुंबिक वर्चस्ववाद पवारांनाच घातक

सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीची राजकीय आणि आर्थिक सूत्रे फक्त पवार कुटुंबाच्या ताब्यात घेतली. त्यांनी पार्थ आणि जय पवार यांचे अधिकार अमर्याद वाढवून ठेवले, याबद्दल नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आज काहीही बोलले नाहीत. तसे ते बोलणारही नाहीत. पण म्हणून ते कायमच “गप्प” बसतील, असे मानायचे बिलकुल कारण नाही. उलट पार्थ पवारच्या मागचे जमीन घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ अजून सुटलेले नाही. ते परत त्याला चिकटणारच नाही, याची कुठलीही गॅरेंटी नाही. महाराष्ट्रात निवडणूक यायला अजून ३ वर्षे बाकी आहेत. या दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवारांची राजकीय वर्तणूक भाजपला अपेक्षित राहिली, तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचे राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करून देखील त्यांना लाभ होण्याची शक्यता नाही. उलट पवारांचा कौटुंबिक वर्चस्ववाद त्यांनाच घातक ठरेल. मोदींच्या भाजपचे नेते पवारांचा कौटुंबिक वर्चस्ववाद मर्यादेपलीकडे सहन करायची शक्यता नाही.

Sunetra Pawar’s political behaviour like mamata banerjee and m k stalin dynasty politics

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment