
नाशिक : ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवारांच्या राज्यसभेतल्या निवडीनंतर दिसून आली. महाविकास आघाडीला शरद पवारांना बिनविरोध राज्यसभेत पाठवावे लागले त्या पाठोपाठ संजय राऊत यांनी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचे प्यादे पुढे सरकवले.
याच संजय राऊत यांनी सुरुवातीपासून राज्यसभेसाठी शरद पवारांचे नाव पुढे सरकवून ठेवले होते. पण त्यामुळेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचा हक्क असताना शरद पवारांनी संजय राऊत यांच्या मार्फत स्वतःचे नाव पुढे रेटल्यामुळे दिल्लीतले काँग्रेस श्रेष्ठी नमतील आणि आपल्याला काँग्रेस श्रेष्ठींचे ऐकावे लागेल, याची भीती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना होतीच, ती भीती शरद पवार राज्यसभेवर गेल्यामुळे सार्थ ठरली.
पण त्यापलीकडे जाऊन काँग्रेस संघटना आणि त्यांच्या सगळ्या आमदार खासदारांची पवार आणि ठाकरे यांच्या मागे फरफट झालेली दिसली.
काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला, पण…
वास्तविक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने तब्बल 14 खासदार निवडून आणले महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसच पहिल्या नंबरचा पक्ष बनला होता, पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ते यश टिकवता आले नाही. पक्षाची त्या निवडणुकीत फार मोठी घसरण झाली, तरी 16 आमदार निवडून घेऊन काँग्रेस महाविकास आघाडीतला दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष बनला. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वांत मोठा फटका बसला. त्यांना फक्त 10 आमदार निवडून आणता आले.
– प्रभाव टिकवून धरण्यात काँग्रेस अपयशी
पण 16 आमदार आणि 14 खासदार असून सुद्धा काँग्रेसचा महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या एवढा प्रभाव पडू शकला नाही. 16 आमदार आणि 14 खासदार हे काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकले नाहीत. दिल्लीतल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सुद्धा आपल्या आमदार आणि खासदारांना अपेक्षित असे बळ दिले नाही. काँग्रेस श्रेष्ठींनी आमदार आणि खासदारांना अपेक्षित असे बळ दिले असते, तर या लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राजकीय कामगिरी करून प्रभाव टिकवून दाखवला असता. कारण भाजपने काँग्रेसचा कितीही दारुण पराभव केला असला, तरी काँग्रेसची पक्ष संघटना आणि काँग्रेसच्या मागे असणाऱ्या मतदार आजही कायम आहे.
– पवारांना शिकवताना असता धडा
त्या उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फक्त माध्यमांमधले नाव आणि प्रभाव कायम आहे, त्या पलीकडे पक्ष संघटना आणि राजकीय प्रभाव कमालीचा घटला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही नावे आता अशी उरली आहेत, की जे उमेदवार पाडू शकतात, पण निवडून आणू शकत नाहीत, अशा स्थितीत काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रातल्या आपल्या आमदार आणि खासदारांना अपेक्षित बळ दिले, तर ते काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकतात. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ती संधी आली होती. काँग्रेसने पवारांना पाठिंबा न देता उमेदवार उभा केला असता, तर कदाचित तो पराभूत झाला असता, पण त्याच वेळी शरद पवारांची संधी कायमची हुकवल्याचे क्रेडिट काँग्रेसला घेता आले असते, किंबहुना शरद पवारांना कायमचा धडा शिकवता आला असता. शरद पवार नेहमीच डबल गेम करतात, त्यामुळे आम्ही त्यांना धडा शिकवला, अशी वातावरण निर्मिती काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांना सगळ्या महाराष्ट्रात करता आली असती. शरद पवारांचे डबल गेम राजकारण काँग्रेस कायमचे उघडे पाडू शकली असती. पण काँग्रेस श्रेष्ठींनी ती संधी घालवली आणि आपल्याच आमदार आणि खासदारांचा अवसानघात केला.
आता उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी काँग्रेस काय भूमिका घेणार की पवारांच्या डबल गेम पुढे बळी पडली तसेच उद्धव ठाकरेंच्या प्रभावाला बळी पडणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Congress’s fury behind Thackeray and Pawar
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण सूचना; ग्राहकांनी भीती बाळगायचे नाही कारण!!
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!



Post Your Comment